आठवण
मी बारावीची परीक्षा संपल्या नंतर बाबां बरोबर त्यांच्या जनता दलाच्या अधिवेशनाला गेले होते. आणि तिथे जाऊन मी स्वयंसेवक म्हणून काम करत होते . माझ्याकामात मी बरीच मग्न होते .तितक्यात बाबांनी मला बोलावून घेतले . त्यांनी अभयशी माझी ओळख करून दिली तो नुकताच दहावीला गेलेला मुलगा आपल्या बाबांबरोबर अधिवेशनात आला होता ..तिथे स्वयंसेवक म्हणून काम करायला नाही तर नासिक फिरायला . त्याला नासिक फिरवण्याची जबाबदारी बाबांनी माझ्यावर दिली .
छे! बाबा मला हे काय काम सांगताय !! मला तर येथे अधिवेशनातच मजा वाटत होती आणि ह्या अनोळखी छोट्याश्या मुला बरोबर फिरायला जायला मला तर अजिबात इंटरेस्ट नव्हता .पण शेवटी माझ्या दोन मैत्रिणी आणि आमच्यात तो छोटा अभय , आम्ही फिरायला गेलो.
तो .कॉन्वेंट मधला हायफंडा त्याच्या पुढे आम्ही म्हणजे गावठी पण हळूहळू तो छान गप्पा मारू लागला आणि काही तासातच आम्हा सगळ्यांची छान मैत्री झाली .हसरा , सतत त्याच्या शाळेतल्या गमतीने हसवत राहणारा ,येत जाता आमची खोडी काढणारा असा छान मित्र मला त्या दिवशी मिळाला. दुसर्या दिवशीही आम्ही फिरायला निघणार तेव्हड्यात बाबांनी मला जरा लांब नेले ,"हे बघ त्या मुलाची जरा जास्त काळजीघे त्याला एक असाध्य आजार झालेला आहे ,तो जास्त दिवस जगणार नाही ."
अरे देवा!!! आता तर कुठे चांगला मित्र मिळाला आणि बाबांनी आज हे काय सांगितलं . माझ्या छातीत धडधड सुरु झाली . हातापायाच थरकाप व्हायला लागला मी जागीच बसून घेतलं . माझ्या डोळ्या समोर दोन्ही हाताने आनंद वाटणारा अभय उभा होता .आणि मी हतबल होऊन त्याच्याकडे बघत होते . परंतु लाबुनच अल्लड अभय मला हाक मारत होता . चल ना लवकर .मी सुन्न अवस्थेत त्याच्यादिशेने जात होते . त्या संध्याकाळी त्याला त्याच्यागावाला परत जायचे होते पण त्या क्षणाला त्याला बाय करणे मला फार अवघड गेले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा