आपला मुलगा प्रेमात पडला....
आपला मुलगा प्रेमात पडला....
मैत्रिणीचा फोन आला, बोलली मुलगा प्रेमात पडलाय काय करू?
अरे हा काय प्रश्न आहे का? मुलगा प्रेमात पडला तर तू आनंदी हो की. त्याच्या मनात त्या सुंदर भावना तयार झाल्या. एकतर त्या फुलव नाहीतर गपचुप बैस, उगा पुरातन काळातले सल्ले देऊ नकोस त्याला आणि उगाच त्याचे प्रेम कोमेजून टाकू नकोस. होऊ दे मोकळ त्याला. जगू दे त्याला त्याचे विश्व.
साधा सरळ सोपा पर्याय प्रथम दर्शनी एक हेल्दी मनाच्या व्यक्तीने तरी हाच विचार केला पाहिजे.
परंतु वाटावा तितका सोपा प्रश्न असता तर मैत्रिणींनी सल्लाच मागितला नसता. प्रॉब्लेम खूप वेगळे होते तिचे
वरून दिसणारे प्रॉब्लेम जात,राहणीमान ,परिस्थिती,आणि शिक्षण हे सगळे प्रश्न आ वासून समोर उभे होते.
मैत्रिणीला सांगितले तुला ती मुलगी आवडली का? आवडली तर आवडल्याचे दहा कारण सांग आणि नाही आवडली तर न आवडल्याचे दहा कारण सांग.
आवडल्याचे फक्त दोन कारण तिने सांगितले. ते म्हणजे ती दिसायला छान आहे आणि ती नीटनेटक्या कपड्यात वावरते.
ह्या दोन्ही गोष्टींना काहीही अर्थ नाही. कारण त्या काळ आणि परिस्थिती नुसार बदलणार. त्या शाश्वत गोष्टी नाही. शाश्वत गोष्टीत काही सांग, उदरणार्थ स्वभाव आणि शिक्षण असं काही सांग. कारण मनुष्य स्वभावावरुन आपण त्या व्यक्तीचे मोजमाप केले पाहिजे. तिच्या स्वभावात असं काही आहे का तिच्या कडून त्याची खूप काळजी घेणे, समजवून घेणे असं आहे.
की दुसरे टोक चिडचिड आणि हेकेखोर पणा, स्वतःच्या गोष्टी खरं करण्याची झटापट, खुंशी प्रवृत्त्ती,दुसऱ्याला कमी लेखण्याची प्रवृत्ती ह्या असल्या स्वभावात आहे का हा विचार कर.
कसं आहे हे आधी मला नीट समजून सांग. तू त्याची आई आहे म्हणून त्याला विरोध करणार आहेस की त्याचे प्रेमात पडणे तुला आवडले नाही, की परिस्थिती चुकीची आहे म्हणून विरोध करणार आहेस का? आधी तुझी भूमिका मला सांग म्हणजे त्या भूमिकेत येऊन तुझ्याशी बोलेल.
मैत्रिणीला उगाच वाटलं मी तिच्या मुलाच्या बाजूनेच बोलणार आणि तिला हवा असणारा सल्ला मी तिला देणार नाही आणि विनाकारण मैत्रीण माझ्याशी लटका राग धरून चिडचिड करायला लागली आणि पुढचे संवाद बंद करणार तितक्यात मी तिला बोलली, अग मी तुझ्या भल्याचाच विचार करणार आहे आणि मी कोणताही सल्ला हा तुझ्या भल्यासाठीच देणार आहे. आपल्याला घरातलं कोणतंच वातावरण बिघडवून काहीही करायचं नाहीये. आपल्या घरातला एकनेक व्यक्ती हा आनंदी झाला पाहिजे असच करायचय.
मग क्षणाचाही विलंब न करता मैत्रीण परत बोलू लागली.
आता ती न आवडण्याचे काय कारण आहे? ते सांग तर तिने त्या बाबतीत दहा नाही तर खूप कारण सांगितले.
मुलाची काळजी ही सर्वात उच्च स्थानी होती. त्यामुळे त्यात तिला शंभर पैकी शंभर गुण होते.
मुलगी न आवडल्याचे कारण काही पटले काही नाही पटले.
जात हे एक कारण होत. पूर्वग्रह दूषित राहून जातीचा विचार करू नकोस लोक खूप पुढारले आहेत. शिक्षण घेताय परिस्थिती बदलली आहे. पण हे मैत्रिणीच्या बाबतीत दुर्दैवाने काही पूर्ण झाले नाही , त्या मुलीची ही पहिलीच पिढी शिक्षणात उतरली होती,आणि म्हणावी तितकी ती मुलगी शिक्षणात एव्हडी हुशार नव्हती. आत्ताच्या मुलांच्या बाबतीत विचार केला तर त्यांची ही तिसरी पिढी शिक्षणात उतरलेली असावी. किमान दुसरी पिढी ही बिझनेस मध्ये उतरलेली असावी. पण ह्या गोष्टीत मैत्रिणीशी सहमत व्हावे लागले.
दुसरा प्रश्न होता कुटुंब तर मुलीला वडील नसल्यामुळे ती तिच्या फॅमिलिसह काकांकडे राहते. कुटुंब उदरनिर्वाहासाठी जर दुसऱ्या कुटुंबावर अवलंबून असेल तर कायम दुसऱ्या कुटुंबाच्या अधीपत्या खाली ह्या कुटुंबाला वावरावे लागते. म्हणजे ह्या कुटुंबावर पूर्णपणे त्या समोरच्या कुटुंबाचा प्रभाव पडलेला असतो. आता ह्या ठिकाणी फक्त एकाच कुटुंबाचा विचार करता नाही येणार. इथे दुसऱ्या कुटुंबाचाही विचार होणे गरजेचे आहे. फॅमिली, उत्पन्नाचे साधन, राहणीमान, विचारसरणी, खाणे पिणे, व्यसन,सवयी, सामाजिक भान, सामाजिक व्यवहार.
सर्वच बघणे गरजेचे होते.
सर्व गोष्टी बोलतांना हे जाणवलं की माझी मैत्रीण किमान त्या मुलीची जात कशीही स्वीकारेल पण त्या मुलीच्या घरच्या वातावरणामुळे तिच्या वागण्यात आलेला संकुचितपणा ती कधीही स्वीकारणार नाही. संकुचित विचारसरणी असलेली व्यक्ती खरंच खूप लोकांना आनंदी नाही ठेवू शकत.
आता प्रश्न हा होता तिच्या मुलाला ह्या सर्व गोष्टी पटवून देण्याची.
बाई ग, न्यूटनचे सगळे पहिले दुसरे तिसरे नियम समजावून घे आणि त्या प्रमाणेच तुझ्या क्रिया कर कारण त्या क्रियांवर प्रतिक्रिया ह्याही येणार आहेत. त्या प्रतिक्रिया सहन करताना तुझ्यातला बॅलन्स ढळू देवू नको. म्हणजे कुटुंबाला साधा एक ओरखडा सुद्धा येणार नाही.
अनघा हिरे
नासिक
anagha.hiray@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा